यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये हिंदी विभागाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली | WARANA University |

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar  AI Workshop

कृत्रिम बुद्धिमता विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र वितरण करताना प्राचार्य डॉ. ए. एम. शेख. सोबत कार्यशाळा संयोजक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्रमुख पाहुणे डॉ. कबीर खराडे, डॉ. प्रकाश मुंज.

वारणानगर / प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये शिवाजी विद्यापीठ परिस्पर्श योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) भाषा आणि नॅक मूल्यांकन प्रक्रियेवर नाविन्यपूर्ण परिणाम, या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. कबीर खराडे आणि हिंदी विभागातील प्रा. डॉ. प्रकाश मुंज उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ए.एम. शेख  यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यशाळेचे संयोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांना सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या जीवन कार्यावरील  'मी एक कार्यकर्ता' ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेसाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे -सावकर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ. कबीर खराडे यावेळी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवन सुखकर होईल. भविष्यात मानवी जीवनाच्या भावना मोजणीची क्षमता विकसित करण्याचे काम ही याच माध्यमातून होत आहे. शैक्षणिक संस्था, त्यांची शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्ता वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून संस्था आपला दर्जा सुधारू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या अचूक गुणवत्तेचे मूल्यांकन 'नॅक'च्या  माध्यमातून होईल त्याच्यासाठी महाविद्यालयांनी, संस्थानी सज्ज आणि सजग राहण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.

             दुसरे वक्ते प्रा.डॉ. प्रकाश मुंज म्हणाले की, भाषा आणि नॅक, मूल्यांकन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावत असेल तरीही भविष्यात मानवी मन आणि भावनावरती या तंत्राचा विपरीत परिणाम होईल. या माध्यमातून माणूस माणसापासून दूर जाण्याची ही शक्यता आहे. तो तंत्रज्ञानाच्या माध्यमाने सहजासहजी सर्व गोष्टी प्राप्त करू शकत असला तरीही भविष्यात या तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे आणि त्याच्या प्रभावामुळे मानवी मन अस्वस्थ होईल आणि त्यानंतर माणसाला माणसाचीच गरज भासेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार कमी होणार असले तरीसुद्धा नवीन रोजगार या माध्यमातूनही तयार होऊ घातले आहेत, ते ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. ए. एम. शेख म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विकास आणि सुधारणा या कार्यासाठी करण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेसाठी या तंत्रज्ञानाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आकर्षक आणि मनोरंजक बनविण्यासाठी या तंत्राचा उपयोग कौशल्याने करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी रोपट्याला पाणी देऊन कार्यशाळेचा शुभारंभ झाला. स्वागत प्रास्ताविकात, कार्यशाळेचे संयोजक हिंदी विभागाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक, भाषिक आणि मूल्यांकन प्रक्रियेसाठी प्रभावीपणे मदत करू शकेल. काळानुरूप नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यकच आहे. मानवी जीवन आणि मानवी समस्या यांच्यावरही सकारात्मक परिणाम करण्याची ताकद कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात आहे पण त्याचा मर्यादित वापर होणे गरजेचे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी


              कार्यशाळेसाठी जयसिंगपूर, कोंडीग्रे, हातकणंगले,वाठार, कोडोली, मलकापूर- येलूर महाविद्यालयातील प्राध्यापक निमंत्रित होते. यावेळी प्रा. तुषार वाघमारे, प्रा. अमोल काळे यांनी प्रतिक्रिया देऊन कार्यशाळा उपयुक्त आणि यशस्वी झाल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. आर.बी. बसनाईक, डॉ. रणजीत लिधडे, डॉ. प्रीती शिंदे - पाटील, प्रा. शिल्पा पाटील, डॉ. राजकुमार पांडव, डॉ. सचिन पुजारी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गिरिजा कोकरे - देसाई यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.मनाली सूर्यवंशी यांनी केले. 'नॅक' समन्वयक प्रा. उत्तम कदम यांनी आभार मानले.



Adarsh Institute Warananagar




   इतर बातम्या :    

Post a Comment

0 Comments