वारणानगर येथे संपन्न जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पथनाट्य कलाकारासमवेत प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत डॉ. एस.एस. खोत, प्रा. सौ. जयंती गायकवाड.
वारणानगर \ प्रतिनिधी :
वारणानगर, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "जागतिक पर्यावरण दिन", विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. उपक्रमांमध्ये ५६ महाराष्ट्र बटालियन आणि ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी, कोल्हापूर युनिटचे छात्रसैनिक सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. सुधाकर खोत आणि लेफ्टनंट सौ. जयंती गायकवाड यांनी केले. प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी सर्व छात्रसैनिकांना 'पर्यावरण पूरक जीवनशैली' संबंधी शपथ दिली. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, "नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य वापर करून आणि प्रदूषण कमी करूनच आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करता येईल."
यानंतर ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या विद्यार्थिनीनी 'शाश्वत विकासासाठी पर्यावरण रक्षण' या विषयावरील पथनाट्य सादर केले. या पथनाट्या मध्ये सध्याची जीवनशैली, त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि प्रदूषणाचे पर्यावरणावर व मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याचे मार्मिक चित्र अभिनय आणि संवादातून सादर केले. तसेच 'पर्यावरण वाचवायचे असेल तर वृक्ष लागवड अत्यावश्यक आहे' असा संदेशही दिला. पथनाट्या मध्ये सिद्धी कुंभार, सारिका सकटे, शिवानी शेलार, नम्रता भोसले, सलोनी कांबळे, संस्कृती लोंढे, संध्याराणी फडकर यांनी सहभाग नोंदविला.
कॅप्टन सुधाकर खोत आणि लेफ्टनंट जयंती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 'प्लास्टिकचा वापर: वरदान की शाप' या विषयावर चर्चासत्र रंगले. यामध्ये अत्यावश्यक गरजांसाठी मेडिकल, औषध, दैनंदिन व्यवहार, द्रव पदार्थांची साठवण यासाठी चांगल्या प्लास्टिकचा वापर टाळणे अशक्य असले तरी इतर ठिकाणी 'प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळायलाच हवा' असा निष्कर्ष विद्यार्थिनींनी काढला. सर्वांच्या सहभागातून रोजच्या गरजांमधील प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावर विचार मंथन झाले. प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये भाजी आणि बेकरी प्रॉडक्ट्स खरेदीसाठी जाताना स्वतःची कापडी पिशवीचा वापर, दूध, तेल यासारख्या द्रव पदार्थांसाठी स्टील किटलीचा वापर, पाणी साठवणूक करण्यासाठी घरावरील प्लास्टिकच्या टाकी ऐवजी जमिनी अंतर्गत सिमेंट अथवा धातूची टाकीचा वापर, दंतमंजन तसेच इतर रासायनिक औषधांन ऐवजी झाडपाला आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर इत्यादी द्वारे प्लास्टिकचा वापर कमी करता येईल अशी निरीक्षणे छात्रसैनिकांनी नोंदविली. चर्चासत्रामध्ये 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे छात्रसैनिक कॅडेट ऋतुजा मगदूम, कल्याणी चव्हाण पाटील, आरती वड, सायली रुपणे, साक्षी पोतदार, सारिका चव्हाण यांनी सहभाग नोंदवला. तसेच ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मधून कॅडेट संध्याराणी सूर्यवंशी, प्रणवी पाटील, तनुजा पाटील, संध्याराणी पडकर, सिद्धी कुंभार, श्रावणी शेलार, वैष्णवी मोहिते, पल्लवी बुरान, सलोनी कांबळे, प्रिया शिंदे, सानिका सकटे इत्यादी छात्रसैनिकांनी उत्स्फूर्तपणे आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल विजयंत थोरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हे हि वाचा :
🔴 वारणानगर येथे "मल्लखांब एक कल्पक खेळ", विषयावरील राष्ट्रीय वेबिनारला उस्फुर्त प्रतिसाद.
0 Comments