मुंबई / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे नांदणी मठ (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे. महादेवी हत्तीण पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन, राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचा पक्षकार म्हणून समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्च स्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्यांचे निराकरण करण्यात येईल.
महादेवी हत्तीणीची योग्य निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांच्या उपलब्धतेसह एक पथक तयार करून, आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यकता वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या सुविधा तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमावी, अशी विनंतीही राज्य शासनामार्फत याचिकेमध्ये करण्यात येईल. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
वनविभागाने सर्व हत्तीची माहिती संकलित करावी महाराष्ट्रातील जे हत्तीबाहेर नेण्यात आले, अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला आणण्यासाठीराज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली. बैठकीस खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह जैन स्वामीव स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
0 Comments